देशातील अनेक राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील टोल दरांमध्ये सुमारे ५ टक्क्यांची वाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे खासगी वाहनांपासून ते व्यावसायिक वाहनांपर्यंत सर्व प्रवाशांच्या प्रवासखर्चात वाढ होणार आहे. यासोबतच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल वसुली प्रणालीत मोठा बदल करत रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व वाहनधारकांना फास्टॅग किंवा यूपीआयच्या माध्यमातूनच टोल भरावा लागणार आहे.
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर हलक्या वाहनांसाठी टोल दर वाढवण्यात आले असून कार, जीप आणि व्हॅन चालकांना आता एकेरी प्रवासासाठी १७५ रुपये तर परतीच्या प्रवासासाठी २६५ रुपये मोजावे लागतील. कर्नाटकातील बेंगळुरू-मैसूर एक्सप्रेसवे तसेच बेंगळुरू विमानतळ मार्गावरही ३ ते ५ टक्क्यांनी टोल वाढ करण्यात आली आहे. तमिळनाडूमधील ईस्ट कोस्ट रोड आणि मदुराई रिंग रोडवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनाही आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. गुजरातमधील NH-48 वरील भरथाना टोल प्लाझावर ट्रक, बस आणि इतर अवजड वाहनांच्या दरात वाढ करण्यात आली असली तरी कार आणि जीपसाठीचे दर सध्या कायम ठेवण्यात आले आहेत.
टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे, वेळेची बचत करणे आणि व्यवहार अधिक पारदर्शक बनवणे हा या नव्या डिजिटल प्रणालीमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र ज्या वाहनांवर फास्टॅग उपलब्ध नाही किंवा ज्यांना डिजिटल व्यवहाराची सवय नाही, अशा प्रवाशांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी फास्टॅग वेळेवर रिचार्ज ठेवण्याचे आणि डिजिटल पेमेंटची तयारी करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.